सामाजिक संस्थांच्या कामात समविचारी संस्थांच्या नेटवर्कची भूमिका महत्त्वाची आहे. एकत्रित शिकणे, विचारमंथन करणे, प्रश्नांची सोडवणूक करणे हा सामूहिक प्रवास नेटवर्कच्या साथीने शक्य होतो. आपल्या कार्यक्षेत्रातील शेकडो गावात हजारो कुटुंबासोबत काम करत असताना कित्येकदा अनेक कसोटीचे क्षण येतात - कधी काही अनुभवांचा अर्थ लागत नाही तर कधी आपल्या काही धारणा पुन्हा तपासून घेण्याची गरज भासते तर कधी अधिक वेगळे पर्याय शोधावे लागतात. अशावेळी नेटवर्कचा आधार अत्यंत मोलाचा ठरणारा असतो.
नेटवर्क म्हणजे परस्पर संवादाला वाव देणारा मंच होय - समविचारी संस्था, अभ्यासक, सरकार यंत्रणांचे प्रतिनिधी यांच्याशी विचारविनिमय करण्याची ही जागा आहे. हे विचारमंथन आपल्याला अधिक समृद्ध करते, एखाद्या प्रश्नासाठी कोणते उत्तर लागू पडू शकते व कोणते नाही याचा अंदाज बांधायला मदत करते, वर्तमानातील तसेच भविष्यातील आव्हानांची समज व त्यांना सामोरे जाण्याची तयारी वाढवते. प्रगती अभियान खालील नेटवर्कमध्ये सक्रीय असून या नेटवर्कमधील सहभागाने आमच्या कामाची दृष्टी अधिक व्यापक व समृद्ध होण्यास मदत झाली आहे.